शिवसेना आणि राष्ट्रवादी मधील अंतर्गत वादावर चर्चा करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही पक्षामधील गैरसमज दूर करून पवारांनी शिवसेनेची नाराजी दूर केली. या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज फिरत आहेत. त्यांना कोरोनाची भीती वाटत नाही. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कसं चालेल? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. ते आज पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
“शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात त्यांना भेटायला जायला हवं. उद्धव ठाकरे वांद्रे आणि गोरेगावला उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते पंढरपूरला गेले. या व्यतिरिक्त ते घराबाहेर पडले नाहीत” अशी टीका पाटील यांनी केली.
“उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, हे एकवेळ चालेल. पण ते मातोश्रीवरसुद्धा कुणाला भेटत नाहीत. मग सरकार कसं चालेल? शेवटी जोपर्यंत सरकारचा धाक येत नाही तोपर्यंत प्रशासन चालतच नाही”, असेही पाटील म्हणाले.