मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे कर्तव्य आहे की मुंबई सोबत संपूर्ण राज्यातल्या जनतेला देखील अनाथ सोडू नये. त्यांनाही सोबत घेऊन चालावे लागेल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, काल कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्यात आले होते. कोरोनासंबंधित अनेक मुद्यांवर मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
“अँटी बॉडीज शरीरात तयार झाल्यात का हे तपासणारी चाचणी युद्धपातळीवर सुरु करणे आवश्यक आहे. त्यामुळे किती लोकांना लसीची आवश्यकता नाही हे निष्पन्न होईल. ज्या पद्धतीने मुंबईत सेरो सर्वेक्षण सुरु झाले आहे त्याच पद्धतीने सेरो सर्वेक्षण हे पुणे व इतर शहरांत लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. मुख्यमंत्री पुण्याला आवश्यक ते सहकार्य करतील जे ते आपल्या प्रिय मुंबईसोबत करण्याचा प्रयत्न करीत आहेत”, असे देखील पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चेदरम्यान त्यांना काही उपाय सुचविले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात PPE किट, मास्क, औषधं, इंजेक्शन,ऑक्सिजन सिलेंडर हे सेंट्रल पर्चेस ने (शहर नुसार) सरकारी व खाजगी रुग्णालयांना दिले तर रुग्णालयातील बेडचे भाडे, डॉक्टरांचे आणि पॅरामेडिकल स्टाफचे शुल्क एवढेच आकारले जाईल. ते देखील राज्य सरकारने प्रति दिवस ठरवून दयावे. आपण दिलेले साहित्य व रुग्णालयाने लावलेले शुल्क याचे मिळून प्रत्येक रुग्णाचे रुग्णालयातील बिल हे 1 लाख रुपयांहून अधिक होणार नाही. परिणामी PPE किट, मास्क, इंजेक्शन यासाठी अधिक किंमती आकारण्याच्या तक्रारी कमी होतील.जनतेचा लाभ आणि सरकारजवळ कमी तक्रारी म्हणजेच संपूर्ण रूपाने उत्तम प्रशासन होईल.