पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठीच्या प्रस्तावास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. लवकरच ही गावे महापालिकेत समाविष्ट होतील. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र या निर्णयावर भाजपकडून टीका करण्यात आले आहे.
23 गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राज्य सरकारने 23 गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत आणि राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून घेतला, असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
या गावांचा समावेश हा टप्प्याटप्प्याने करावा. तेथील नागरिकांची आणि प्रशासनाने केलेली मागणी लक्षात घेऊन गावांच्या विकासासाठी पुरेशा निधीची व्यवस्था करुनच गावांच्या समावेशाचा निर्णय घ्यावा, ही आमची भूमिका होती, असेही ते म्हणाले. या गावांमधील सुविधांसाठी 10-11 हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी सरकार कोठून आणणार ? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला.
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये अपेक्षित असून, पुढील वर्षी मार्च महिन्यापासून नवी प्रभागरचना करण्यास महापालिका प्रशासनाकडून सुरुवात होणार आहे. त्याआधी महाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), पिसोळी, मांजरी (बु.), नऱ्हे, मंतरवाडी, शेवाळेवाडी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, नांदेड, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, नांदोशी-सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, वाघोली, किरकटवाडी, खडकवासला, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि होळकरवाडी ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट होतील.