पंढरपूर : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि विरोधकांनी पंढरपुरात आपल्या प्रचारसभांनी निवडणुकीच्या मैदानात धुरळा उडवून दिला असून, यावेळेस आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी आणि दाव्यांचा देखील नेत्यांकडून पाऊस पाडला जात आहे.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सरकार बदलायचं माझ्यावर सोडा’, असे विधान प्रचारसभेत केले होते. याला काल अजित पवारांनी, विरोधकांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, असे उत्तर देत, विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना, पवार यांच्या कालच्या वक्तव्याचा समाचार घेत, ‘महाराष्ट्रात बेबंदशाही नाही, आम्हीपण पाटील आहोत,’ असा टोला लगावला आहे. ते भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी आज पंढरपुरात आले आहेत.
तसेच यावेळी पाटील यांनी, आम्हालापण बोलता येतं. अजित पवारांची अनेक प्रकरणांमध्ये अजून चौकशी व्हायची आहे. मात्र पराभवाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्याकडून अशी बेताल वक्तव्य केली जात आहेत. पवारांनी इतका अहंकार बाळगू नये. हम किसी को टोकेंगे, तो छोडेंगे भी नही, असे म्हणत त्यांनी सरकार कधी बदलायचं ते आम्ही बघू, असा स्पष्ट सूचक इशारा देखील दिला आहे.