पुणे : महागाई हा आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित विषय आहे. त्यावर फार बोलण्याने काही उपयोग होत नाही. १० वर्षांपूर्वी ४० हजार रुपयांचा मोबाईल, आज चार हजार रुपयांना मिळतो. यावरून गेल्या १० वर्षांत महागाईच्या दराच्या तुलनेत तो स्वस्तच आहे, हे आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
समाजामध्ये चांगली गोष्ट घडली की त्यांचे श्रेय घेतले जाते. हे घडतच राहणार आहे. पूर्वी डिझेल-पेट्रोलवर केंद्र सरकारचा कंट्रोल असायचा. मनमोहन सिंग यांच्या काळात हा कंट्रोल आंतरराष्ट्रीय बाजाराकडे गेला आहे. मात्र हे सांगतानाच त्यांनी बेरोजगारीबाबत उत्तर देणे टाळले.
राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला कोणतीही गरज नाही. शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करावे, असे जरी सांगितले तर 164 वरून 187 होतील. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेशिवाय काही जमत नाही. प्रचंड अस्वस्थता आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच त्यांचे ध्येय आहे. महाविकास आघाडीला 2024 च्या निवडणुकीत उमेदवार देखील मिळणार नाही, असंही बावनकुळे म्हणाले.
फक्त आणि फक्त आमदार निघून जाऊ नये, यासाठी या भीतीतून वारंवार बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच व्यासपीठावर चार आमदार देखील राहिलेेले नाही. आमदार सोडा, गजानन कीर्तीकरांसारखे नेते सोडून जात आहेत. आजही अनेक नगरसेवक व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. शरद पवार यांनी ट्रॅपमध्ये घेऊन शिवसेनेची वाट लावली आहे, असंही बावनकुळे म्हणाले.