सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं. मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवला.
आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीला संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी गोंधळ घातला.
छत्रपतींनी तिसऱ्या रांगेत स्थान दिलं जात असेल तर आम्ही बाहेर काय तोंड दाखवणार, असा प्रश्न मराठा समाजाच्या समन्वयकांनी उपस्थित केला. त्यामुळे बैठकस्थळी गोंधळ झाला. मात्र नंतर संभाजीराजेंनी संयमाची भूमिका घेतल्याने हा वाद मिटला. मी इथे केवळ एक सदस्य म्हणून आलो आहे. त्यामुळे मान-अपमान महत्त्वाचा नाही. तर सारथी महत्त्वाची आहे,’ अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी समन्वयकांची समजूत काढली.
संभाजीराजेंच्या आसन व्यवस्थेवरून वाद झाल्यानंतर आता बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही बैठक सुरू झाली आहे. यावेळी संभाजीराजेंना अजित पवारांच्या बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून सारथीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या बैठकीत नेमके काय निर्णय होणार, याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे.