मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आणि इतर काही मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हेही उपस्थित होते. तसेच, या भेटीनंतर ठाकरे आणि मोदी यांची वैयक्तिक भेट देखील झाली.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांत या भेटीबद्द्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेल्यानंतर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, मोदी-ठाकरे वैयक्तिक भेटीबद्दलचा खुलासा केला असून, त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून याविषयीचा तपशील लिहिला आहे.
‘मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधानांना थेट फोन लावला. तेव्हा मोदी लगेचच फोनवर आले. त्यांनी राज्याची खुशाली विचारली. मराठा आरक्षणाप्रश्नी भेटायचे आहे. “अब मेरे साथ दो और साथी है, उनको भी साथ लाना है”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्यावर, पंतप्रधानांनी लगेचच “हो, वेळ देतो” असे म्हटले. ही भेट कोणाच्याही मध्यस्थीशिवाय झाली हे महत्त्वाचे,’ असं ‘सामना’मध्ये लिहिले आहे.