चीनच्या वुहान शहरात असणाऱ्या लॅबमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे लाखो लोकांचा जीव गेल्याचा दावा करण्यात येत असून कोट्यवधी लोक बाधित झाल याच लॅबमध्ये आता भारताविरोधात मोठा कट रचला जात असून चीन आणि पाकिस्तानने यासाठी हातमिळवणी केल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. या दोन्ही देशांनी जैविक युद्धाचा घाट घातला असून तीन वर्षांसाठी एक गुप्त करार केला आहे, असे एक अहवालात उघड झाले आहे.
संरक्षण तज्ज्ञ अँथनी क्लान नावाच्या एका व्यक्तीने चीन आणि पाकिस्तान जैविक हत्यारांची संख्या वाढवण्यासाठी एकत्र आल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्याची विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (DESTO) सोबत चीनने घातक विषाणूवर संशोधन करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करार केला आहे. पाकिस्तान हिंदुस्थानविरुद्ध आणि चीन अमेरिकेसह अन्य राष्ट्रांवर याचा वापर करू शकतो. विशेष म्हणजे या संशोधनाचा सर्व खर्च वुहान लॅब उचलणार असल्याने संशय आणखी बळावतो.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार जैविक हत्यारांची संख्या वाढवण्यासाठी एंथ्रेक्स सारख्या जीवघेण्या विषाणूवर रिसर्च करण्यावर सहमती झाली आहे. ‘क्लाजोन’ नावाच्या एका पथकाने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. याआधी चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे जगभरात चीनची नाचक्की झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर थेट आरोप करत यास ‘चायनीज व्हायरस’ असेही नाव दिले. यामुळे सध्या दोन्ही देशातील तणावही वाढलेला आहे.