जगातील तिसरा मोठा महासागर म्हणजे हिंदमहासागर. 70 लाख 56 हजार किलोमीटर लांब असलेल्या याच हिंदमहासागरात चीन भारताविरोधात नवा कट रचत असल्याचे समोर आले आहे.
चीनच्या या कटाची खलबतं थेट पाकिस्तानच्या ग्वादर आणि कराची बंदरात सुरु आहेत. या दोन्ही बंदरांवरुनच चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात दुहेरी युद्ध छेडण्याच्या विचारात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
जमिनीवर भारतीय जवानांनी चिनी ड्रॅगनचे दात त्यांच्याच घशात घातले. त्यामुळे लडाखमध्ये चर्चेचं सोंग आणून चीननं पाण्याद्वारे डिवचण्याची कारस्थानं सुरु केली आहेत. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल खेळलीय. त्यामुळे समुद्रात चीनला पाकिस्तानच्या बंदराचं बळ मिळणार आहे, असं मत संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
चीनला समुद्रात मर्यादा आहेत. समुद्रातील युद्धात संख्याबळापेक्षा भौगोलिक रचनेला जास्त महत्व असतं. या दोन्ही गोष्टींमध्ये भारतीय नौदल चीनपेक्षा सरस मानलं जातं. समुद्रात एकट्याच्या जीवावर भारताविरोधात लढणं चीनला परवडणार नाही. म्हणून पाकिस्तानला हाताशी धरुन अरबी समुद्रात चिनी सरकारनं नेव्ही बेसची शोधाशोध सुरु केलीय. याआधीपासून पाकिस्तानच्या ग्वादर आणि कराचीत चीनचे बेस आहेत.
2017 मध्ये चीननं आफ्रिका खंडातील जिबुतीमध्ये पहिला हायटेक बेस बनवला होता. तसाच हायटेक बेस चीनला हिंद महासागरातील IOR मध्ये बनवायचा आहे. IOR हा पाकिस्तानचं ग्वादर आणि कराची बंदर यांच्या अत्यंत जवळचा भाग आहे. या ठिकाणामुळे चीनी पाणबुड्या आणि जहाजांना भारताजवळ येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, चीनच्या या चालबाजीवर भारताकडेही चोख उत्तर आहे. आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये चिनी वस्तू या दक्षिण चिनी समुद्रातून पोहोचतात. भारतानं जर मनात घेतलं, तर मलाका स्ट्रेटद्वारे भारत या मार्गात अनेक अडथळे आणू शकतो. मात्र, फक्त आत्ताच नाही, तर भविष्यात सुद्धा भारताला सतर्क राहावं लागणार आहे. कारण, चीन-पाकिस्तानात होत असलेले करार हे पुढच्या काळात भारताबाबत चिंतेचे विषय ठरु शकतात.