मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुन्हा अडचणीत आले आहेत. विनयभंगाच्या आरोपानंतर आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायचा इशारा दिला आहे. आव्हाड यांच्या इशाऱ्यावर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
संविधानावर विश्वास ठेवणारे आहे, असं आव्हाड कायम सांगतात, मग त्यांना वाटत असेल गुन्हा केलेला नाही, तर त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा. आता गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे पोलीस तपास होईल. आमदारकीचा राजीनामा देऊ, असं म्हणून पोलिसांवर जर दबाव आणण्याचा प्रयत्न असेल, तर ते कधीही शक्य होणार नाही, असं भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.
ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली, त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.
संविधानावर विश्र्वास ठेवणारा आहे, असं @Awhadspeaks कायम सांगतात
मग त्यांना वाटत असेल गुन्हा केलेला नाही, तर त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा
आमदारकीचा राजीनामा देऊ, असं म्हणून पोलिसांवर जर दबाव आणण्याचा प्रयत्न असेल तर ते कधीही शक्य होणार नाही..@BJP4Maharashtra @cbawankule pic.twitter.com/ZcSYz7AxIS
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 14, 2022
सोबतच, जितेंद्र आव्हाड हे विधानसभेचे सन्मानीय सदस्य आहेत, त्यांना नियम माहित आहेत. राजीनामा स्वीकारण्यापूर्वी पडताळणी होईल आणि मगच तो स्वीकारला जाईल. याप्रकरणी, तपास सुरू असून निर्दोष व्यक्तींवर करवाई केली जाणार नाही. तसेच, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, किंवा विशेषाधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी ही सभागृहाची आणि अध्यक्षांची आहे, ती आम्ही निश्चितपणे पार पाडू. जर कोणाला राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी सर्व योग्य प्रोसीजर करायला हवी. कायदा सर्वांसाठी समान आहे, आम्ही त्याचं योग्य पालन करू आणि निर्णय घेऊ. मात्र, जितेंद्र आव्हाड किंवा कोणत्याही सदस्याचा अद्याप राजीनामा आमच्याकडे आलेला नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.