मुंबईच्या रस्त्यावर जोपर्यंत वडापाव मिळणार नाही तोवर मुंबई सुरळीत झाली असं देशात कोणीही म्हणणार नाही. त्यामुळे तो केव्हापासून सुरू होईल, असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केला होता. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
“मुंबईत वडापाव मिळण्याच्या दिशेने मुंबई सुरळीत करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. अशा अनेक गोष्टी लोकांच्या आवडीच्या आहेत,” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसंच यावेळी त्यांना राज्यातील मंदिरं केव्हा उघडणार असाही सवाल करण्यात आला. “देव आपल्यात आहे. देव म्हणतायत मी तुमच्यात आहे. त्यामुळे तुम्ही मंदिरात येऊ नका. तुम्ही ही परिस्थिती सांभाळा असं ते म्हणत आहेत,” असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी संत गाडगे महाराजांचाही उल्लेख केला.
शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित होत आहे. या मुलाखतीत राऊत यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलखुलास दिले आहे.