शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. कोरोना व्हायरस संकटात मुख्यमंत्र्यांना दौरे केले नाहीत, अशी टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. या प्रश्नावर देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
“कोरोना कालावधीमध्ये तुम्ही मंत्रालयामध्ये कमीत कमी वेळा गेलात, असा आपल्यावर सतत आरोप होतो याबद्दल काय सांगाल?,” या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मंत्रालय आता बंद आहे. आज तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे. तुम्ही त्याचा योग्य वापर करु शकत नसाल तर तुमच्यासारखे दुर्भाग्य असणारे तुम्हीच आहात. आता मुलाखत झाल्यानंतर घरी जाऊन मी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. हे रोजचं चालले आहे. विदर्भातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मी काल व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन घेतली. परवा तिन्ही पक्षांच्या आमदारांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. म्हणजे एका वेळेस घरात बसून मी सगळीकडे जाऊ शकतो. मी पूर्ण राज्य कव्हर करतोय आणि निर्णय घेतोय.
मुख्यमंत्री म्हणाले की, आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. फिरणे आवश्यक आहे हे मी मान्य करतो, त्याला मी नाही म्हणत नाही. मात्र जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी जाता. पण ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सर्व ठिकाणी जाता. प्रवासाचा वेळ वाचतो. उद्या मी म्हणेन की तुम्ही विमानाने का जाता बैलगाडीतून जा. तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करायचाच नाहीय तर मग शोध लावता कशाला ?