शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज (26 जुलै) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन विषयावर आपले मत मांडले. “मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील मुलाखती दरम्यान सांगितले
उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरुन विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा करुन दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल.”
“250-300 कोटी मी का द्यावे. मुंबई-सूरत बुलेट ट्रेनमधून काही फायदा होणार आहे का? दाखवा आम्हाला, काय होणार फायदा? किती मुंबईतून आणि सूरतमधून ये-जा होणार आहे? किती आर्थिक घडामोड होणार आहे? हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली तर जनतेसमोर ठेवतो, पण एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेल आणि आता अयोग्य वाटत असेल तर तो प्रकल्प मी रद्द करेन.”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.