कारखाने सुरु करुन नागरिक, छोटे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना वेठिस धरणार असाल, तर माझा व्यक्तिगत विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार माणिकराव जगताप यांनी घेतली आहे. कारखानदारांना राजकीय पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप माणिकराव जगताप यांनी तटकरे बापलेकीवर नाव न घेता केला.
“रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केला आहे. JSW, JNPT, RCF, रिलायन्स असे असंख्य मोठे कारखाने येथे आहेत. महाड, रोहा, पनवेल, तळोजा एमआयडीसी आहेत. सरकार एकीकडे सांगतय नागरिकांनी बंद पाळला पाहिजे, नागरिक पाळतात. पण कारखानदार पाळतात का? फार्मा कंपनीला सूट द्यायची, मग त्यांना संबंधित कंपन्यांना सूट द्यायची, म्हणजे किती कारखाने बंद राहिले?” असा सवाल त्यांनी विचारला.
“कुठलाही कारखानदार बंद करत नाही, त्यांना राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ असते. त्याचा परिणाम आपण रोह्यात बघतोय. सुदर्शनमध्ये 100 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. त्याचा परिणाम रोह्यातील नागरिक आणि गरीब जनतेला भोगावा लागतोय” असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांचे नाव न घेता माणिकराव जगताप यांनी केला.