राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. या पार्शवभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटर आणि पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधला.
भगवान राम मंदिरावरून शेकडो वर्षांपर्यंत वाद राहिला आहे. याला राजकीय स्वरूप दिले जात असून यावर माझा आक्षेप आहे, असे दिग्विजय म्हणाले. तसेच, ज्यावेळी संपूर्ण देशात ही परंपरा चालत आहे की प्रत्येक शुभ कामात मुहूर्त पाहिला जातो. चातुर्मास चालू आहे आणि भादो आहे, मग ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन का होत आहे, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला आहे.दिग्विजय सिंह यांनी भाजपाच्या नेत्या उमा भारती यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला उमा भारती का जात नाहीत? मी त्यांना विचारतो की मुहूर्त योग्य आहे का? संतांनी बोलले पाहिजे, पण यावेळी त्यांचे मौन का आहे? मी म्हणतो की, यावर चर्चा झाली पाहिजे. ” याचबरोबर, राम मंदिराचे भूमिपूजन राजीव गांधी यांनी आधीच केले आहे, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
याचबरोबर, दिग्विजय सिंह यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, “अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आत तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? तुमची अशी काय अडचण आहे, की, तुम्ही हे सर्व होऊ देत आहात?”