मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात हाहाकार उडाला आहे. दररोज लाखो नवे रुग्ण आढळत आहेत. एकीकडे रुग्णसंख्या वाढत चालली आहे, तर दुसरीकडे मात्र लसींअभावी लसीकरण मोहीमेला अनेक ठिकाणी ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे.
केंद्र सरकारने लसीकरणासाठी राखून ठेवलेले 35 हजार गेले कुठे ? असा सवाल आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जगभरात सर्व देश मोफत लसीकरण करत असताना भारतात केंद्र सरकार मोफत लसीकरण का करु शकत नाही? केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकानुसार सरकारने लसीकरणासाठी 35 हजार कोटीचा निधी राखून ठेवला होता. मग ते 35 हजार कोटी गेले कुठे?, असा सवाल त्यांनी केला.
केंद्राने योग्य वेळी लसींना परवानगी न दिल्यामुळे सातारा जिल्ह्यातील मागील 10 दिवसापासून लसीकरण सेवा विस्कळीत झाली आहे. केंद्र सरकारने सर्व लस खरेदी केली पाहिजे. राज्य सरकार किंवा खाजगी संस्थावर हि जबाबदारी ढकलू नये. अन्यथा लसीकरणासाठी खाजगी संस्था मोठी किमंत आकारु शकतात, अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राकडे पाठ फिरवत गुजरातचा दौरा केला होता. सोबतच मदतनिधी देखील जाहीर केला होता. यावरून देखील टीका करत चव्हाण यांनी ‘मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत ?’, असा सवाल केला होता.
Read Also :