पुण्याचे माजी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली यामुळे महाविकासआघाडीत नव्याने तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. गायकवाडांची बदली राजकीय दबावातून केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला आहे. बालगुडेंनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शेखर गायकवाड यांची बदली केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. शेखर गायकवाडांच्या बदलीमागे मराठी अधिकारी विरुद्ध हिंदी अधिकारी असा वाद आहे” असा आरोप संजय बालगुडे यांनी केला.
“शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली झाली. मुळात त्यांची नेमणूक होऊन जेमतेम सात आठ महिने झाले. मार्चमध्ये कोरोना महामारी सुरु झाल्यापासून चार महिन्यात त्यांनी जेवढे शक्य आहे तेवढे प्रशासक म्हणून अतिशय उत्तम काम केले” असे बालगुडे यांचे म्हंटले आहे.
“पुण्यात अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे श्रेय शेखर गायकवाड यांना जाते. पालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकारणे त्यांनी काढली. एका कर्तबगार अधिकाऱ्याची बदली करणे हे गलिच्छ राजकारणाचे प्रतिक आहे. काही सत्ताधाऱ्यांना आयुक्त हे आपल्या ताटाखालचे मांजर असते, असे वाटणे योग्य नाही.” असेही बालगुडे म्हणाले.
“शेखर गायकवाड यांची बदली कोणाच्या दबावाखातर झाली आहे. त्यांच्या बदलीने राज्य सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. त्यांची बदली रद्द करुन पुन्हा पुणे पालिका आयुक्तपदी नेमणूक करावी” अशी मागणी संजय बालगुडे यांनी केली आहे.