राजस्थानमधील सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रातील सरकार देखील पडणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकार स्थिर असून, कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर गाठ माझ्याशी असल्याचे, काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
याशिवाय भाजप आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, भाजपचे 105 पैकी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं सांगितली तर राज्यात राजकीय भूकंप येईल. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. आमचे कुणी फुटणार नाहीत, याबाबत खात्री आहे. मात्र, आमच्यातील कोणी सोडून गेलं तर त्याला बदडून काढू, असा इशाराच त्यांनी दिला.
कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भाजपने घाणेरडे राजकारण सुरु ठेवलंच आहे. शेणातला किडा जसा शेणातच राहतो तसं यांचं झालं आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांना एवढी मोठी सत्ता मिळाली. तरी त्यांचा हाव आता राज्यामध्ये आहे. राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मला सातत्याने काही लोक विचारतात की महाराष्ट्रात नेमकं काय होणार? महाराष्ट्र सरकार स्थिर आहे, असे त्या म्हणाल्या.