चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदारांची कामं होत नाहीत. तसंच मान राखला जात नसल्याची तक्रार आमदार सुभाष धोटे यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. या दरम्यान आमदार महोदयांनी ही तक्रार केली आहे. काँग्रेस आमदारांची कामं होणार नसतील तर लोकांना काय तोंड देणार असाही प्रश्न आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. आमदार धोटे यांची मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तीव्र नाराजी दिसली.
एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून काम रोखल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला. जर आमदारांचा मान राखला जात नसेल, काँग्रेस आमदारांची कामं होणार नसतील, तर लोकांमध्ये कसं जाणार असा सवाल धोटे यांनी विचारला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावे अशी विनंती यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी केली.