सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. फडणवीस यांना मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यांनतर त्यांनी उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेकदा पत्र देखील पाठवले.
आता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत कोरोना स्थितीवर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी फडणवीसांच्या दौऱ्यांवरुनच टीकेची झोड उठल्याचे चित्र आहे. त्यामुळे फडणवीसांचे हे कोरोना दौरे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.
अनेकदा आकडे कमी दाखविण्याच्या नादात टेस्टिंग प्रोटोकॉल पाळले जात नसल्याचे देखील फडवणसीसांना म्हटले. कोव्हिड-19 मुळे मृत्यू झालेल्यांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी अनेकदा केला. अमरावती आणि अकोल्याचा दौरा केल्यानंतर त्यांनी क्वारंटाईन सेंटर आणि कोरोना वार्डची पाहणी करत सरकार गोंधळलेले असल्याची टीका केली होती.
फडणवीसांच्या याच झंझावती दौऱ्यांचा सत्ताधारी महाविकास आघाडीने धसका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे फडणवीसांच्या दौऱ्यावर सत्ताधारी नेते जोरदार प्रहार करताना दिसत आहे. विविध मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्ताधारी नेते टीका करताना दिसून येत आहे.