देशाच्या इतिहासात प्रथमच राजधानीत लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. ‘कोव्हिड19’च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी केवळ 20 टक्के व्हीव्हीआयपी पाहुणे उपस्थित असतील.तर कोरोनामुक्त झालेल्या तब्बल 1,500 योद्ध्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं निमंत्रण असेल.
नुकत्याच झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाने सर्वसामान्य जनतेऐवजी ‘कोरोना विजेत्यां’ना स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहण्यास बोलावण्याचा निर्णय घेतला. नंतर गृह मंत्रालयाला त्यानुसार नवीन आराखडा रचण्यास सांगितले गेले. स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण सचिव अजय कुमार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालकांनी मागील आठवड्यात लाल किल्ल्याला भेट दिली होती. कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन व्यवस्था करण्यास सांगितलंय.
दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्यात यावेळी संपूर्ण बदल होईल. शालेय विद्यार्थी नसतील, मात्र राष्ट्रीय कॅडेट कोर्प्सचे (एनसीसी) कॅडेट्स लाल किल्ल्यातील उत्सवाला उपस्थित राहतील. पूर्वीप्रमाणे व्हीव्हीआयपी पाहुणे पंतप्रधान जिथून स्वातंत्र्यदिनाचे भाषण करतात, त्या व्यासपीठाजवळ बसू शकणार नाहीत. पूर्वी जवळपास 900 व्हीव्हीआयपी दोन्ही बाजूंना आसनस्थ होत असत. परंतु यंदा त्यांची व्यवस्था थोडी दूरवर होईल. केवळ शंभरच्या आसपास व्हीव्हीआयपींना परवानगी असेल.