नवी दिल्ली : देशात एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या उच्चांक गाठत असून, दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने, केंद्र सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला, महामारीच्या उच्चाटनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला होता. त्यामुळे केंद्र सरकार देशात लॉकडाउन लावणार का? असा सवाल विचारला जात होता. यावर बुधवारी निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान लॉकडाउनच्या पर्यायावर चर्चा सुरु असल्याची माहिती दिली आहे. व्ही के पॉल हे टास्क फोर्सचे प्रमुखदेखील आहेत.
त्यांनी सांगितले की, “१० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर आणि ६० टक्क्यांहून आयसीयू बेड्सची व्याप्ती असणाऱ्या राज्यांना आधीच नाईट कर्फ्यू आणि कठोर निर्बंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”. तसेच, “स्पष्ट आणि संतुलित नियमावली देण्यात आली आहे. त्याचवेळी अजून काही निर्बंध वाढवण्याची गरज असेल तर त्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो आणि गरजेप्रमाणे ते निर्णय घेतले जातील,” असं देखील त्यांनी सांगितलं.
दरम्यान याआधी टास्क फोर्सने केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या होत्या. यामध्ये लॉकडाउनचाही उल्लेख होता. मात्र आर्थिक परिणाम लक्षात घेत सल्लामसलत करुन सर्व पावले उचलली पाहिजेत अशी शिफारस टास्क फोर्सने केली होती. तसेच, संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव पर्याय नसून, देशाची झोनमध्ये विभागणी करण्याचा सल्ला देखील टास्क फोर्सने दिला आहे.