कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रशासनाला अवघ्या काही तासातच हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. आता नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. परंतु, कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला आहे.
एकीकडे कडक लॉकडाऊनची घोषणा, तर दुसरीकडे गोकुळ दुध संघाच्या निवडणुका यामुळे टीका होऊ लागल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता नागरिकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 5 मे 2021 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून 13 मे 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (संचार बंदी) उत्स्फूर्तपणे पाळावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, तातडीची वैद्यकीय गरज याशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी इ. दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत उघडी राहतील. परंतु नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी. अत्यावश्यक बाब नसेल तर अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये, असेही नियमात म्हटले आहे.