मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील नेते वारंवार एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. मात्र, आता मंत्री दीपक केसरकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे दोन्ही गटांनी एकत्र यावं, अशी इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली.
शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार की नाही? हे मी सांगू शकत नाही. मात्र दोन्ही गट एकत्र यावे, ही राज्याच्या जनतेची इच्छा आहे, असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. सोबतच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे षड्यंत्र ओळखून सर्व शिवसैनिक बाहेर पडून बाळासाहेबांच्या विचारासोबत येतील, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्याचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटामध्येच आहेत. रविवारी संजय राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांची भेट घेतली. यानंतर आता अमोल किर्तीकर लवकरच बाळासाहेबांच्या विचारासोबत येणार आहेत, असा दावा केसरकर यांनी केला आहे. यामुळे ठाकरे गटाला अजुन एक धक्का बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.