संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा टीझर काल ट्विट केला. यामध्ये संजय राऊत यांनी एक शरद, सगळे गारद असं म्हटले आहे. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं टायटल द्यायला हवं होतं, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
नाशिकमधील जिल्हा सामान्य रूग्णालय, कोविड केअर सेंटर येथे फडणवीसांनी भेटी दिल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सामनाच्या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी शरद पवार यांची घेतलेल्या मुलाखतीवरून राऊत यांना टोला लगावला ‘बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा बोचरा सवाल फडणवीसांनी विचारला.
‘सामना’ किती जण वाचतात? माध्यमांना आयती बातमी मिळते, म्हणून ‘सामना’ला तुम्ही प्रसिद्धी देता. ‘सामना’मध्ये कोरोनाबाबत एकही अग्रलेख नाही.’ असे फडणवीस म्हणाले. बदल्यांचे आणि फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी कोरोनावर लक्ष द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
तसेच “महाविकास आघाडीनं पाच वर्षे जरूर सरकार चालवावं, त्यांना शुभेच्छा आहेत; पण सामना एवढा अंतर्विरोध कुठेच झाला नाही, असे फडणवीस म्हणाले. ‘सामना’ रोज आपली भूमिका बदलतो. कधी पवारसाहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने.त्यांना स्वतःचा बेसच नाही”, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.