राजू शेट्टी लुटूपुटूची लढाई करत आहेत. राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्यांची ही लुटूपुटूची लढाई केवळ सरकार वाचवण्यासाठी आहे’, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
राज्यात तीव्र स्वरूपात सुरु झालेल्या दूध दरवाढ आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी झाले होते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले होते. दुधाच्या पावडरसाठी सुद्धा दर कमी झाला होता. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. याचं पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या वतीने व संघटनांच्या वतीने आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली.
‘देशात एक ग्रामही दुधाची भुकटी आयात झालेली नाही’, असे म्हणत फडणवीसांनी बाळासाहेब थोरात यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ‘सध्याच्या बिकट स्थितीत राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हा केवळ दुधाच्या उत्पन्नावर जगतो आहे. मात्र, सध्या दुधाला मिळणाऱ्या दरात गाईच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. खरंतर, दुधाचे दर घातले कि दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देते. मात्र, तरीही विद्यमान सरकारकडून अद्याप असे कुठलेही अनुदान देण्यात आलेले नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे’, असे म्हणत फडणवीसांनी टीका केली आहे.