मुंबई: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी आज पहाटे त्यांना ताब्यात घेत वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. पायी वारी साठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. मात्र करुणा महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. मात्र पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. पायी वारी करू नये असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.
हे पण वाचा: मोठी बातमी : वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर नजरकैदेत
बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्यांचा असा अपमान?, असे सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांनी या कारवाईचा ट्विटरद्वारे निषेध केला आहे.
वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक!
विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय!
श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच!
बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता?
वारकर्यांचा असा अपमान?थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे!
तीव्र निषेध! https://t.co/I9WfssELOl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 3, 2021
दरम्यान, आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात काही वारकरी कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी किंवा देहू येथे गर्दी करू नये, तसेच निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले होते. आळंदी आणि देहू येथे निर्बंध लागू केले असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
हे पण वाचा: पंढरपूरच्या वारीनं देशातीलच नव्हे, जगातील कोरोना नामशेष होईल – संभाजी भिडे
७०० वर्षांची परंपरा पण, प्रशासनाला सहकार्य गरजेचे : आमदार लांडगे
आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रात तब्बल ७०० वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. प्रत्येकवर्षी आषाढी वारीसाठी पायी पालखी सोहळा निघतो. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे पायी पालखी सोहळा करता येत नाही. मी स्वत: एक वारकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या भावनेशी मी सहमत आहे. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या आता पोलीस बंदोबस्तात पंढरपूरकडे रवाना झाले आहेत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.