देशात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. कोरोना संकटात महाराष्ट्रातील अनेक भागांचा दौरा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या दरम्यान आढळलेली वस्तूस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
फडणवीस यांनी मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रूग्णालय, पुणे आणि पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मिरा-भाईंदर, नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी दौरा केला होता. या नंतर आता त्यांनी सविस्तर पत्र लिहित मुख्यमंत्र्यांना निरिक्षणे आणि उपाययोजना सांगितल्या आहेत.
राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र..
(2/4) pic.twitter.com/lD17KjZRpv— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 13, 2020
फडणवीस यांनी केलेल्या काही प्रमुख मागण्या –
- संपूर्ण राज्यात रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याचा नीट अंदाज लावून येणार्या काळासाठी आजच पुरेशा प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा असणारे बेडस् उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महापालिका, नगरपालिकांच्या वर्गानुसार, तेथे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर राज्य शासनामार्फत तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.
- रूग्णांना वेळेत वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक आहे. केवळ विविध रूग्णालयात चकरा मारणे आणि कुणीही त्याला दाखल करून घेण्यास तयार नसणे, यातून रूग्ण दगाविण्याचे प्रमाण राज्यात अधिक आहे. टेंभासारख्या ठिकाणी 14 तास, मुंबईत 30 तास रूग्णांना प्रवेश न मिळणे अवघड आहे. रूग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसणे, हेही एक मोठे आव्हान आरोग्यव्यवस्थेपुढे उभे झाले आहे.
राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र..
(4/4) pic.twitter.com/PAZZ5DdpBv— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 13, 2020
- राज्यामध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्या म्हणून रुग्णसंख्या अधिक आहे, हे गृहीतकच मुळात चुकीचे आहे. कारण सर्वाधिक चाचण्यांचा दावा चुकीचा आहे. प्रति दहालाख (टेस्ट पर मिलियन) लोकसंख्येमागे चाचण्या करण्यात महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर आहे. कोरोना मोठ्या प्रमाणात शिरकाव करतोय. अशावेळी चाचण्या हाच एकमात्र उपाय आहे. अजूनही चाचण्यांवर लक्ष केंद्रीत केले नाही, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे चाचण्यांची पूर्ण क्षमता वापरावी.
- अॅक्टमेरा, रेमडेसिवीर ही औषधे बाजारात उपलब्ध होत नाहीत. त्याचा सर्रास काळाबाजार केला जातोय. ही औषधे तत्काळ आणि सहज उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी.
- कोविडला प्राधान्य देताना नॉन-कोविड रुग्णांकडे मोठे दुर्लक्ष होतय्. अर्थात कोरोनाकडे लक्ष देण्याला प्राधान्य असलेच पाहिजे. पण, त्यामुळे इतर रूग्णांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याही मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नॉन-कोविड रुग्णालये सुद्धा योग्यप्रमाणात उपलब्ध असतील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. उदा. नवी मुंबई येथे नॉन-कोविड रुग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होते आहे.
- खाजगी हॉस्पीटल अवाजवी शुल्क आकारतात, गरीबांच्या तर ते आवाक्याबाहेरचे आहे. खाजगी रूग्णालयातील शुल्काचे ऑडिट करण्याची व्यवस्था राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उभारण्यात यावी. काही महापालिकांनी तर रूग्णाला सुटी मिळण्याच्या आधीच ऑडिट करण्याची पद्धत स्वीकारली आहे. या पद्धतीचा अन्य महापालिकांमध्ये सुद्धा अवलंब करता येईल. रूग्णालयांचे तात्पुरत्या तत्वावर महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेत नोंदणी शक्य आहे. ती केल्यास अनेक गरिबांना या योजनेचा लाभ देता येईल. खाजगी रूग्णालयांच्या शुल्क आकारणीसंदर्भात जो शासन आदेश जारी करण्यात आला, त्यात ज्यांचे नियमन करायचे ती यादी छोटी आहे आणि नियंत्रणाबाहेर असलेल्या बाबींची यादी मोठी आहे, त्यामुळे लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. हा आदेश तातडीने बदलण्याची गरज आहे.
- डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस आदी कोविड योद्ध्यांना कोरोना झाल्यास त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. त्यांच्यावर उपचारासाठी वणवण भटकण्याची पाळी येऊ नये. त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत.
अशा अनेक सुचना व उपाययोजना फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचवल्या आहेत.