मुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. राज्यात दिवसाला ६० हजारांवर करोना बाधित रुग्ण आढळत आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. अशा हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
यावरून राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे बीड जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी लसींच्या अभावामुळे लसीकरण कार्यक्रम ठप्प करावे लागल्याने, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोगयमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहून अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बीडच्या पालकमंत्र्यांचं लक्ष आहे कुठे, असा सवालही त्यांनी केला आहे.
यावर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ताई साहेब, मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल,” असं ट्विट करत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! @Pankajamunde @DrPritamMunde
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
तसेच अजून एका ट्विट मध्ये त्यांनी, “जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरीकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच. राजकारण इतरत्र जरूर करा, पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको,” असं आवाहनही केलं आहे.
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. @DrPritamMunde pic.twitter.com/9EjHxh1Rqp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनाही त्यांनी आपल्या टीकेचं लक्ष बनवलं आहे. “अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २ लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत, त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल,” असं म्हणत त्यांनी ट्विटसोबत एक तक्तादेखील जोडला आहे.
दरम्यान आपल्या पत्रात पंकजा मुंडे यांनी, बीड जिल्ह्यातील वाढती करोना रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब असून, करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यामुळे करोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच लसींचा पुरवठा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे या प्रकरणात आरोग्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून, रेमडेसिवीर इंजेक्शन बीड जिल्ह्याला उपलब्ध करून द्यावेत, असे लिहीत नकळतपणे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त केली होती.