देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला सोडू नका. आपल्यासाठी काँग्रेसमध्ये उज्जवल भविष्य आहे. यामुळे त्यांनी पक्ष सोडून भाजपात गेलेले माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंसारखं अनुकरण करू नये, असा सल्ला काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सचिन पायलटांना दिला आहे. तसेच राजस्थानमधील राजकीय संकटाला भाजपच जबाबदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय संकटाबाबत दिग्विजय सिंह म्हणाले, ‘मी पायलटांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र, मी केलेल्या कॉलला आणि पाठवलेल्या मेसेजसला ते कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत.’ तसेच, “अशोक गेहलोत यांच्याकडून आपण दुखावले गेले असलात तरीही, असे सर्व मुद्दे शांततेने सोडविले जातात. शिंदेंनी जी चूक केली, ती आपण करू नये. भाजपा अविश्वसनीय आहे. एखाद्या दुसऱ्या पक्षातून भाजपात गेलेल्या कुठल्याही व्यक्तीला तेथे यशस्वी होता आलेले नाही,’
“ही पहिलीच वेळ आहे, की पायलटांनी मला उत्तर दिले नाही. सचिन माझ्या मुलासारखा आहे. ते माझा सन्मान करतात आणि मलाही ते आवडतात. मी त्यांना तीन-चार वेळा फोन केला आणि मेसेजही केले. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. ते आधी तत्काळ उत्तर देत होते. महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट आहे. महत्वाकांक्षेशिवाय कुणीही पुढे जाऊ शकत नाही. मात्र, महत्वकांक्षेबरोबरच प्रत्येकानेच आपली संघटना, विचारधारा आणि राष्ट्राप्रती एकनिष्ठ असायला हवा”, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.
काँग्रेसने पायलटांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढले आहे. पायलटांसोबत आणखी 18 आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या खुर्चीवर तलवार लटली आहे. भाजपा राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. असे असतानाच दिग्विजय सिंहानी पायलटांना सल्ला दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनीही. राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय संकटामागे भाजपाचा हात असल्याचे म्हटले आहे