कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करावा लागला. केंद्रीय पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय होण्याआधी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा झाली. मात्र या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आमची भूमिका वेगळी नाही. आमच्यामध्ये मतभेद नाहीत, असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले.
लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. प्रसारमाध्यमंदेखील त्याला अपवाद नाहीत. त्याचे परिणाम वृत्तपत्रांवर झाले. राजकीय नेत्यांचे कार्यक्रम कमी झाल्यानं नाराजीच्या बातम्या आल्या. मात्र आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं शरद पवार म्हणाले.
सुरुवातीच्या काळात कठोर लॉकडाऊन गरजेचा होता, अशी माझी भूमिका होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कठोर लॉकडाऊन केला. तशी भूमिका घेतली नसती, तर मुंबईची अवस्था न्यूयॉर्कसारखी झाली असती. मृतांची संख्या प्रचंड वाढली असती, असं शरद पवार यांनी सांगितलं