राजस्थानचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून मुंबईतून ५०० कोटी रुपये जमा केले जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यानंतर आता काँग्रेस नेते आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
‘एकीकडे कोरोनाविरुद्ध लढा सुरू असताना भाजपकडून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे संविधानाला छेद देणारे आहे. राजस्थानमध्ये जे घडलं ते दुर्दैवी आहे. पैसे घेऊन आमदारांना विकत घेण्याचा मी निषेध करतो,’ अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे.
‘महाराष्ट्र सरकार मजबूत आहे. पुढची पाच वर्ष हे सरकार चालेल. मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष सगळ्या आमदारांशी संपर्कात आहेत. आपण काळजी करू नका देवेंद्रजीच्या हातात काही लागणार नाही,’ असंही नितीन राऊत म्हणाले.
काँग्रेसकडून राजस्थानात घोडेबाजार केल्याचे आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. तसंच सचिन सावंत यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.