मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सत्ताधारी आणि विरोधक पहिल्याच दिवशी आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून हा धक्काबुक्कीचा प्रकार झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला असून, परिणामी भाजपच्या १२ आमदारांवर १ वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
“आजची शिवीगाळ, धक्काबुक्की ही फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली झाली”- नवाब मलिक
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना, भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी काही आक्रमक आमदारांनी, पुढे हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आमदार आशिष शेलार यांनी सर्व आमदारांना वेलमधून आपल्या जागेवर नेलं. एका आमदाराने तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. त्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आलं. मात्र यानंतर अध्यक्षांच्या दालनाबाहेर धक्काबुक्कीही झाली. यावेळी काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली, असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर १२ आमदारांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा जाधव यांनी केली.
भाजपचे आमदार सभागृहात धमकी देत आहेत; नाना पटोलेंचे गंभीर आरोप
दरम्यान, या निलंबनानंतर भाजप आमदारांनी सभागृहाचा त्याग केला आणि बाहेर पडल्यानंतर पायऱ्यांवरच त्यांनी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. “ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, “ठाकरे सरकार हाय हाय…”, “गली गली मे शोर है ठाकरे सरकार चोर है”, “लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, “हिटलरशाही नही चलेगी…” अशा घोषणा देत भाजपा आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरच आपला निषेध नोंदवला.
भाजप आमदारांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या – तालिका अध्यक्षांचा खळबळजनक आरोप
तसेच, या कारवाईबद्दल माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ”खोटी स्टोरी रचून आमच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती. ती शंका या सरकारने खरी केली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला पुरतं उघडं पाडलं आणि हे सरकार अपयशी आहे, हे दाखवून दिलं. त्यामुळेच त्यांनी आमच्या आमदारांवर खोटेनाटे आरोप लावून, त्यांना निलंबित केलं आहे,” असा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे.
निलंबित केलेले १२ आमदार…
संजय कुटे
आशिष शेलार
अभिमन्यू पवार
गिरीष महाजन
पराग अळवणी
राम सातपुते
हरिश पिंगळे
भातखळकर
जयकुमार रावल
नारायण कुचे
बंटी भांगडिया
योगेश सागर
Read Also :
- १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपची तातडीची बैठक; राज्यपाल कोश्यारींची घेणार भेट
- भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यासाठी ठाकरे सरकारचा पुर्वनियोजित कट
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा द्यावा, ठाकरे सरकारकडून विधानसभेत ठराव मंजूर
- विधानसभेचं वातावरण तापलं, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ
- सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; भाजपच्या तब्बल १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन