कोलकाता : देशात एकीकडे करोनाचा परिस्थिती हाताबाहेर जात असताना, दुसरीकडे पाच राज्यांमधील निवडणूका सुरु आहेत. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाही, दुसरीकडे या राज्यांमध्ये सुरु असलेल्या प्रचारसभा आणि गर्दी यामुळे देशभरातून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेवरून सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाने देखील निवडणूक आयोगावर कठोर ताशेरे ओढले होते. पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने, करोना विषाणूच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या फैलावला केवळ निवडणूक आयोगच जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत आयोगाची कानउघाडणी केली होती.
यांनतर, निवडणूक आयोगाने २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी घालण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. यातच आता करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार धरल्यानंतर निवडणूक आयोग मद्रास हायकोर्टात धाव घेतली असून, आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं सांगत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
तसेच, निवडणूक आयोगाने “माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टमुळे निवडणुका पार पडण्याची घटनात्मक जबाबदारी असलेली स्वतंत्र घटनात्मक संस्था म्हणून निवडणूक आयोगाची प्रतिमा डागाळली आहे,” असंही याचिकेत म्हटलं आहे. त्याचबरोबर, निवडणूक राजकीय नेते आपलं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले असल्याचाही उल्लेख केला आहे. आता शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.