उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला काल पोलिसांनी उज्जैन येथून अटक केले होते. मात्र आता विकास दुबे पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याची माहिती सोमर आली. या एन्काऊंटरनंतर काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रदीप शर्मा यांनी कानपूर एन्काऊंटरची पाठराखण केली आहे.
प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचं समर्थन केलं आहे. “मला वाटतं हा खराखुरा एन्काऊंटर आहे. 8 पोलीस शहीद झाले तेव्हा समाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते कुठे होते? आता पोलिसांनी एन्काऊंटर केल्यावर लगेच हे कार्यकर्ते समोर येत आहेत”, असं प्रदीप शर्मा म्हणाले. पोलिसांनी चांगलं काम केलं की लगेचच काही लोक प्रश्न उपस्थित करतात, असं शर्मा यांनी नमूद केलं.
दरम्यान, विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला.