राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व करोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. मात्र, दुर्देवाने राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे येथे कोणाचा मंत्री कुठे फिरत आहे आणि काय निर्णय देतोय, हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसते,’ असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.
‘राज्य सरकारकडे सध्या पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते रोज एक नवा नियम काढत आहेत. राज्याचे सचिव वेगळा नियम काढतात. मुख्यमंत्री वेगळा जीआर काढतात. महसूलमंत्री वेगळाच जीआर काढतात. तर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी एवढचं काय तर गावचे सरपंच सुद्धा वेगळाच नियम काढत आहेत. त्यामुळे राज्यात मंत्री लॉक झाले आणि जनता अनलॉक झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण कुठे चालले, याचा कोणालाच काही पत्ता नाही,’ अशी टोलेबाजीही त्यांनी केली.