निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे विक्रेत्यांना विनाकारण जबाबदार धरत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील खते व बी- बियाणे विक्रेत्यांनी शुक्रवारपासून (ता.१०) रविवारपर्यंत (ता.१२) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी बियाणे सर्व कृषी डीलर्सना वितरित केले होते. हे बियाणे हे सील पॅकिंग आहे. त्याची शेतकऱ्यांना विक्री केली आहे. परंतु, अवकाळी पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचे बियाणे फार कमी प्रमाणात उगवले. त्यामुळे सर्व कंपन्यांच्या सोयाबीनची तक्रार आली आहे.
कृषी विभागाने सर्व विक्रेत्यांना जबाबदार धरले आहे. त्यासाठी विक्रेत्यांच्या राज्य संघटनेने कृषी विभागाला आमच्यावर गुन्हे नोंद न करता आपण कंपन्यांवर गुन्हा नोंद करावी, आम्हाला यातून मुक्त करावे, अशी विनंती केली आहे. शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी सर्व कृषी विक्रेते हा बंद पाळणार आहेत, असे कोल्हापूर जिल्हा बियाणे कीटकनाशक व खते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या बंदला महाराष्ट्र मिश्रखत उत्पादक संघटना, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी खरेदी-विक्री संघांनी पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी सांगितले.