मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठी वाहिनी ‘कलर्स मराठी’ वर प्रक्षेपित झालेल्या एका प्रसिद्ध कार्यक्रमात, मराठी अभिनेता अतुल परचुरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी एक छोटेसे सादरीकरण करताना त्यांच्याकडून पुण्श्लोक अहिल्याबाई होळकर यांचा अनावधानाने एकेरी नावाने उल्लेख केला गेला.
यावर बीड जिल्ह्यातील धनगर नेते रवी देशमुख यांनी आक्षेप घेत, त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. तसेच धनगर समाजातल्या अनेक नेत्यांनी, अतुल परचुरे यांनी धनगर समाजाची लवकरात लवकर माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर जवळच्या पोलीस ठाण्यात महाराष्ट्रभरातून गुन्हा नोंदवू, तसेच त्यांना महाराष्ट्रभरात कोणत्याही ठिकणी चित्रीकरण करू दिले जाणार नाही. तसेच याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, या वादावर आता पडदा पडला असून, धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या मध्यस्थीनंतर, अभिनेता अतुल परचुरे यांनी तमाम धनगर समाजाची माफी मागितली आहे. तसेच इथून पुढे अश्या प्रकारचे कोणतेही वादग्रस्त विधान होणार नाही, याची ग्वाही देखील त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पाठवून त्यात दिली आहे.
यानंतर, बीड जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते रवी देशमुख यांनी देखील एका व्हिडीओद्वारे, या वादावर आत पडदा पडला असून, हा विषय धनगर समाजाने, राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन इथेच थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचे या विषयात मध्यस्थी केल्या प्रकरणी आभार मानले आहेत.