फ्रान्समध्ये तयार झालेल्या पाच दसॉल्ट राफेल लढाऊ विमानांची तुकडी भारताच्या दिशेने रवाना झाली आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेलचे आगमन होत असल्यामुळे भारतीय वायुदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. घातक शस्त्र, आधुनिक रडार, इलेक्ट्रानिक युद्ध प्रणाली यामुळे ही विमानं वेगाने मोठा हल्ला करुन शत्रुचे प्रचंड नुकसान करण्यासाठी सक्षम आहेत. राफेलसाठी भारताने स्काल्प ही घातक क्षेपणास्त्र खरेदी केली आहेत.
ही विमानं हवेतच इंधन भरुन घेतील आणि न थांबता सात हजार किमी प्रवास करुन थेट संयुक्त अरब आमिराती येथे उतरतील. या ठिकाणी फ्रान्सच्या वायुदलाचे टँकर विमानांमध्ये पुन्हा इंधन भरतील. नंतर ही विमानं थेट भारतात हरयाणातील अंबाला विमानतळावर उतरतील. हवामान व्यवस्थित असल्यास विमानांचे आगमन २९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
जगातील आधुनिक विमानांमध्ये राफेलचा समावेश होतो. ही विमानं अंबाला येथे उतरल्यानंतर युद्धसज्ज ठेवली जाणार आहेत. राफेल विमानांसाठी वैमानिक तसेच ग्राउंड स्टाफचे तांत्रिक प्रशिक्षण झाले आहे. प्रशिक्षित टीम अंबालामध्ये (Ambala) विमानांचा ताबा घेणार आहे. फ्रान्समधून पाच राफेल भारताच्या दिशेने रवाना झाली. या प्रसंगी भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ उपस्थित होते. त्यांनी राफेलमुळे भारताच्या सामर्थ्यात वाढ होणार असल्याचे सांगितले. अश्रफ यांनी राफेल घेऊन रवाना होत असलेल्या भारतीय वायुदलाच्या पथकाची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.