दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात राज्याचे पशु आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका आहे, असे मत पशु-दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं.
“महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. आम्ही चांगली योजना आणू, आंदोलनामुळे ही बैठक होते असं नाही. ही बैठक आधीच नियोजित होती. मी स्वत: ही बैठक 16 जुलैला बोलवली होती. ही बैठक तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आली नव्हती. तर या बैठकीत संघटना आणि नेत्यांनी अनुदानासह दूध उत्पादनाच्या अडचणी मांडल्या,” असे पशु आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार म्हणाले.
“मात्र कोरोना संकटामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. दूध उत्पादकाना मदत करण्याची आमची भूमिका आहे. गेल्या सरकारने 5 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. मात्र अनेकांना लाभच मिळाला नाही. हे टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरीच आहे,” असेही सुनील केदार यांनी सांगितले.