मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. या संतापाच्या लाटेला शांत करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर दौरा सुरु केला. तसेच, त्यांनी राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाला आरक्षणाची किती नितांत गरज आहे आणि हा मुद्दा कसा महत्वाचा आहे हे सांगितले.
दरम्यान, आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली असून, त्यांनी राज्यातील सर्वपक्षीय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना हात जोडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मान- सन्मान टाकून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, “मी नुसतंच मराठ्यांचं नेतृत्व करत नाही, मला राज्यातल्या बहुजनांची चिंता,” असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मी सुचवलले हे ३ पर्याय सगळ्या नेत्यांनी मान्य केले आहेत…
- राज्य सरकारने मराठा आरक्षणावर न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी आणि ही याचिका फुलप्रूफ असावी.
- ही फेरविचार याचिका जर न्यायालयात टिकली नाही, तर राज्य सरकारने क्युरिटिव्ह याचिका दाखल करावी.
- शेवटचा पर्याय – संविधानातल्या ३४२ (अ) अंतर्गत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या कायद्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे द्यावा. तो पुढे राष्ट्रपती, केंद्रीय मागासवर्गीय आयोग आणि शेवटी संसदेसमोर मांडला जाईल.
संभाजीराजेंनी, हे तिन्ही प्रस्ताव भेट दिलेल्या नेत्यांसमोर ठेवल्यावर, सगळ्यांनी ते मान्य केले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. “तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल, तर सत्ताधाऱ्यांनी तसे स्पष्ट सांगावे, या बिचाऱ्या, गोरगरीब जनतेला आशेला लावून खिळवत ठेऊ नये, बाकी पुढे काय करायचं ते आम्ही बघून घेऊ,” असा इशारा त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला.
ठाकरे सरकारला अल्टिमेटम, या ५ मागण्यांचा ६ जून पर्यंत निकाल लावा अन्यथा…
यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून १९६८ सालापर्यंत आरक्षण मिळत होतं, अशी माहिती यावेळी दिली. तसेच, उद्धव ठाकरे सरकार का थांबलं आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी खालील ५ मागण्या राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत. या ५ मागण्यांचा निकाल येत्या ६ जूनपर्यंत मार्गी न लावल्यास त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी रायगडवरून मराठा समाज आंदोलनाचा एल्गार करेल, असा थेट इशारा दिला आहे.
- न्यायालयाने आदेश दिल्यानुसार मराठा समाजातल्या मुला-मुलींच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावा! नियुक्त्यांना आरक्षण द्या!
- ‘सारथी’ला १००० कोटींचा निधी द्या! सारथीला नुसती जागा देण्याऐवजी तिला स्वायत्तता द्या! सारथीचं प्रतिनिधित्व मराठा समाजाला करू द्या! नाहीतर सारथीतुन शाहू महाराजांचं नाव काढून टाका!
- मराठा समाजातील छोट्या व्यावसायिकांना संजीवनी ठरलेल्या ‘अण्णासाहेब महामंडळा’ला निधी वाढवून, त्याला नवंसंजीवनी द्या!
- मराठा समाजातील विध्यार्थी आणि विद्यार्थिनींचा राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह उभारण्याचा निर्णय घ्या!
- ३०% धनिक मराठा समाज सोडून उर्वरित ७०% हा गरीब आणि वंचित मराठा समाज आहे. या उर्वरित मराठा समाजालादेखील बहुजन समाजासारखं आरक्षण द्या!
तसेच…
- मराठा आरक्षण प्रश्नी दोन दिवसांचं अधिवेशन राज्य सरकारने बोलवावं आणि त्यात नुसती चर्चा-आरोप न करता, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली जावीत.
- केंद्रात असलेल्या सर्व महाराष्ट्राच्या खासदारांना, तसेच सर्व मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्षांना, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दिल्लीत होणाऱ्या पहिल्या गोलेमेज परिषदेसाठी आवर्जून बोलावणार!
- मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवावी.
- बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष काढण्याचा विचार करेन!
तसेच यावेळी त्यांनी, “मराठा समाज कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आणि मी इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन आलेलो नाही. मराठा समाजासाठी मी इथे आलो आहे. २००७ पासून मी यासाठी राज्य पिंजून काढत आहे. आज या मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी माझा लढा आहे. मी शाहू महाराजांसारखा समाजाचा एक शिपाई आहे,” असे त्यांनी सांगितले.
“अनेक जणांच्या भुवया उंचावल्या की माझी सामंजस्याची भूमिका अचानक आक्रमक कशी झाली? त्यांना मी सांगतो, सध्या आपली लढाई महामारीशी आहे. मला समाजला वेठीस धरून काही करायचे नाही. परंतु, सरकार आणि विरोधकांची भूमिका मराठा समाजाप्रति अशी का? याचे मला उत्तर मिळाले नाही. या समाजाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यासकट इतर खासदार, आमदार, नेते आणि मंत्री यांची देखील आहे. आरक्षण रद्द झाल्यावर मला समाजातील अनेकांचे फोन आले, मराठा समाज तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत होता. मात्र, माझ्यामुळे तो शांत राहिला,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
Read Also :
- “मी देवेंद्रजींना हात जोडून विनंती केली, तुझं-माझं न करता आपण समाजासाठी एकत्र येऊ.”
- संभाजीराजेंनी मांडली निर्णायक भूमिका; पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…
- ‘अजूनही वेळ गेलेली नाही, हातात हात घालून काम करू’
- इयत्ता १० वीचा फॉर्म्युला ठरला.! नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन विद्यार्थ्यांचे मूल्यांकन
- ठाकरे सरकार राज्यातला लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवणार!