कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर गेले सुमारे चार महिने राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे तेथे पूजाअर्चा करणाऱ्या गुरव समाजाचे उत्पन्न बंद झाले असून उपासमारीची वेळ आली आहे. त्याचवेळी, मंदिराच्या पूजेचा व देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी पॅकेज जाहीर करावे आणि गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी वेब संवादाच्या माध्यमातून गुरव समाजाच्या प्रतिनिधींशी बैठक केली. लॉकडाऊनमध्ये मंदिराच्या पुजेचा आणि देखभालीचा खर्च कायम असल्याने त्यांच्यावरील तणाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे गुरव समाजासाठी काही मागण्या केल्या आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंदिरांमध्ये पूजा करणाऱ्या व मंदिरांची देखभाल करणाऱ्या गुरव समाजाला गेले 4 महिने सोसलेला आर्थिक ताण आणि आगामी 2 महिन्यांची तरतूद अशी 6 महिन्यांसाठी रोख आर्थिक मदत करावी. मंदिरांची साफसफाई, देखरेख, सुरक्षा व पूजाअर्चा याचा खर्च लॉकडाऊनमध्येही चालूच आहे. त्याचा भार गुरव समाजावरच पडत आहे. राज्य सरकारने मंदिरांसाठीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे. लॉकडाऊनच्या काळातील मंदिरांचे वीजबिल प्रचंड मोठे आले आहे. मंदिरांच्या वतीने राज्य सरकारने वीजबिल महावितरणकडे भरावे, असंही चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
आगामी काळात जेव्हा शाळा सुरू होतील, तेव्हा राज्य सरकारने गुरव समाजातील मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी फीसह थेट आर्थिक मदत करावी. तसेच गुरव समाजाला सध्याच्या संकटात तातडीच्या कर्जाचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशीदेखील मागणी पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.