बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांनी गेल्या काही दिवसांत राज्याचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाच्या आत्महत्येनं राज्यात खळबळ उडवली होती. आता, छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षी कांबळे या तरुणीने 14 मार्च रोजी धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला एक महिना उलटूनही तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही.
साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहून, “साहेब, तुमच्या भाचीला न्याय मिळवून द्या,” अशी आर्जव केली होती. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबीयांशी थेट फोनवर संपर्क साधत, आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी या प्रकरणाचा तपास बीड पोलिसांकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आरोपी अभिषेक कदमचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
या प्रकरणातील दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला आणि कठोर कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, याप्रकरणातील आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी धाराशिव पोलीस लवकरच अपील दाखल करतील.
साक्षीच्या आई कोयना विटेकर यांनी धाराशिव पोलिसांवर सहकार्य न करण्याचा आरोप केला असून, त्यांनी याच महाविद्यालयातील आणखी दोन मुलींच्या आत्महत्येचा उल्लेख करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या मुलीसोबत जे घडलं ते इतर कोणत्याही मुलीच्या बाबतीत होऊ नये, म्हणूनच आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
नीलम गोऱ्हे यांनी तरुणींना आवाहन करत सांगितले की, जर कोणी त्रास देत असेल, ब्लॅकमेल करत असेल तर त्याची तक्रार पोलिसांकडे जरूर करावी. पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल आणि आरोपीला शिक्षा होईल.
ही घटना केवळ एका कुटुंबाची वेदना नसून संपूर्ण समाजासाठी एक जागृती आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवून साक्षीला न्याय मिळवून दिला जाईल, अशी अपेक्षा आहे.