नेपाळ आणि भारतातील तणावपूर्ण संबंधांनंतर नेपाळच्या सरकारने भारतीय न्यूज चॅनलवर बंदी घातली आहे. भारतीय न्यूज चॅनल नेपाळ सरकार आणि पंतप्रधानांची बदनामी करत असून गैरप्रचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सने भारतीय वृत्तसंस्था एएनआयला दिली आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनलचे सिग्नल बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती नेपाळी केबल प्रोव्हायडर्स दिली. असं असलं तरी आतापर्यंत नेपाळ सरकारकडून अधिकृत आदेश काढण्यात आलेला नाही.’
नेपाळमधील माध्यमांनुसार माजी उपपंतप्रधान आणि सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ म्हणाले, ‘नेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्याविरोधात भारतीय माध्यमं विनाआधार प्रचार करत आहेत. त्यांनी सर्व मर्यादा ओलंडल्या आहेत. आता हे अती झालं आहे. भारतीय माध्यमांनी आपली बडबड बंद करावी.’