चंद्रपूर : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. मुंबई, पुणे या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. शहरांमध्ये लक्षणं आढळल्यास रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहता येते. मात्र, ग्रामीण भागात हे शक्य होत नाही. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींना विलगीकरणासाठी निधी दिला जाणार आहे.
ग्रामीण भागात ग्रामस्थांची योग्य देखभाल व्हावी यासाठी त्यांचेकरिता ग्रामपंचायत स्तरावरच शाळा, समाजभवन, अथवा ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार योग्य ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारून गावातच सोय करण्यासाठी एक कोटी 88 लाख 30 हजार रुपये अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा खनिज निधीतून मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.
गावात विलगीकरण कक्ष उभारणे व त्यात प्राथमिक सुविधा निर्माण करणे, गावातील नागरिकांची व बाहेरून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणे, गावात फवारणी करणे, आवश्यक साहित्य खरेदी करणे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला खनिज निधीतून अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पाच हजारावरील लोकसंख्या असलेल्या 22 ग्रामपंचायतीला प्रत्येकी रुपये 50 हजार, दोन हजार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या 163 ग्रामपंचायतीला प्रत्येकी रु. 30 हजार तर दोन हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 643 ग्रामपंचायतीला रु. 20 हजार याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण 827 ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना गावातच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोवीड केअर सेंटर मध्येच दाखल व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.