ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप अण्णा हजारे यांनी पत्रात केला होता. तसेच, जर हा निर्णय झाला तर आंदोलन करु, असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यावर आता स्वत: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अण्णा हजारे यांनी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर केल्या जाणाऱ्या प्रशासकाच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर मुश्रीफ यांनी अण्णा हजारे यांना पत्र पाठवून या निर्णयाची सविस्तर माहिती दिली आहे.
त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, निवडणूका घेता येत नाहीत, अशी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करुनच कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातील योग्य व्यक्तीची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला करावा लागला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नसून लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी हीच अपेक्षा आहे, असं मंत्री हसन मुश्रीफ अण्णा हजारेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांना लिहिलेले पत्र
कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्राचा गावगाडा सुरळीत चालावा यासाठीच केला ग्रामपंचायतींवरील प्रशासक नियुक्तीचा कायदा……..
भारतीय संविधानाला बांधील राहूनच तयार केला आहे कायदा……
भविष्यातही मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करतो. pic.twitter.com/SrpisBQfyt— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) July 20, 2020