शिवसेनेचे खासदार आणि सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीमध्ये नेहमीच काहीना काही कुरबुरी सुरू असतात. नेत्यांचे नाराजीनाट्य सुरू असते. यावरुन विरोक्षीपक्ष नेहमीच हे ती चारी सरकार असल्याची टीका करत असते. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, तीन चारी सरकार असलं तरी हे गरीबांच वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. कोणी असा समज करून घेऊ नये की, आता मी मुख्यमंत्री झालो म्हणजे बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन. नाही, मी एवढंच म्हटलंय, मी मुख्यमंत्री या नात्याने सर्वांगीण विचार करेन. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको हे आहेच, पण आतासुद्धा सगळय़ांच्या मताने बुलेट ट्रेन नको असेल तर मी नाही करणार. म्हणून तीन चाकं तर तीन चाकं… ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय! तसंच केंद्रात किती चाकं आहेत? आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे, सांगा ना! मी जेव्हा गेल्या वेळी एनडीए मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती.’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.