मुंबई : देशभरात मागच्या वर्षी आलेल्या करोना विषाणूने अजूनही आपला मुक्काम देशातून सोडला नाहीये. त्याचे उच्चाटन करून टाकण्यासाठी देशभरातील सर्व यंत्रणा, युद्धपातळीवर कार्य करत आहेत.
दरम्यान, याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झालेला दिसून येत असून, मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सर्व माध्यमांतील, तसेच सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण हे दूर दृश्य प्रणालीने होत आहे. तसेच राज्यातील १ ली ते ११ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे.
यातच राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात सुरू असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक ऑनलाईन शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून, १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू होणार आहे, तर विदर्भातील तापमान लक्षात घेता. २८ जून पासून शाळा सुरू होणार आहेत.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता रहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्याबाबत खालील सूचना आपण जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना द्याव्यात, असे शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी कळवले आहे.