राज्यात 12,538 पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे . येत्या 4 ते 5 महिन्यात ही भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली .
राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी 8 हजारांऐवजी 10 हजार जागांची पोलिसभरती करण्याचे निर्देश दिले होते. या बैठकीत गृह विभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रीया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर, आता गृहमंत्र्यांनी 12,538 जागांची पोलीस भरती करण्याचे आदेश दिले आहेत.
मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना अनिलक देशमुख यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या आहेत. विषेश म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.