अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांचा याप्रकरणी सुरू असलेला तपास आणि हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याने प्रकरणाचा तपासाला काही एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून याप्रकरणी अनेक घडामोडी बिहार आणि महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर होत आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर बिहारमधील 4 पोलिसांची टीम मंगळवारी मुंबईत दाखल झाली आहे.
याप्रकरणी सर्वात आधी सुशांतची बहिण मिट्टूची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण त्याच्या मृत्यूआधी मिट्टू त्याच्या घरी राहून गेली होती. त्याचप्रमाणे रिया-सुशांतमधील भांडणे आणि तिने त्याला मीडियासमोर एक्सपोज करण्याची दिलेली धमकी याबाबत तिला माहित होते, अशी माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे रिया आणि तिच्यामध्ये कधी संभाषण झाले होते, याबाबत देखील चौकशी करण्यात येईल. कारण रियाने मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अशी माहिती दिली होती की, तिने घर सोडण्यााधी सुशांतच्या बहिणीशी बातचीत केली होती.